
खळबळ जनक बातमी. खोट्या सहीचा घोटाळा! प्रभाग क्रमांक ७-अ मधील उमेदवारी ‘चोरून’ मागे घेतल्याचा स्फोटक आरोप; वैशाली तांबोळी आक्रमक
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 7 अ मध्ये संतापाची ठिणगी पडली आहे. वैध अर्जदार सौ. वैशाली बाळासाहेब तांबोळी यांची उमेदवारी त्या स्वतःने एक अक्षरही न लिहिता ‘मागे घेतली’ असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्याने आज प्रभागातील वातावरण अक्षरशः पेटले.


“मी अर्ज मागे घेतलाच नाही! मग माझ्या नावाने खोटी सही कोणाने केली?” असा थेट सवाल सौ वैशाली तांबोळी यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार निव्वळ चूक नसून, निवडणूक प्रक्रियेवर डल्ला मारण्याचा संगनमताचा खेळ असल्याचा त्यांचा आरोप आहे.
आज सकाळीच सौ. तांबोळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धडक देणार असून,
“हा प्रकार नक्की कोणाच्या इशाऱ्यावर झाला? माझ्या अनुपस्थितीत, माझ्या संमतीशिवाय अर्ज मागे घेतल्याचे कसे जाहीर केले? खोटी सही कोणी केली?”
याबाबत लेखी खुलासा देण्याची मागणी त्या करणार आहेत.


याचबरोबर, हा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या निदर्शनास आणत सविस्तर लेखी तक्रार आजच दाखल करण्याची तयारी तांबोळी यांनी केली आहे.
“खोटी सही करून माझा निवडणुकीचा घटनादत्त हक्क हिरावून घेणाऱ्यांना मी सोडणार नाही,” असा इशारा देत तांबोळी यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि खोटी सही करणारे आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा व न्यायालयीन लढाई लढण्याचा त्यांचा निर्धार आहे.


तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत उघड झालेल्या या कथित गैरप्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून,
“लोकशाहीला गालबोट लावणारा हा प्रकार उघड झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असे तांबोळी समर्थकांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















