सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक अत्यंत उत्साही वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडली. तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नव्या उर्जेसह दिशा देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत विविध महत्त्वाच्या आणि धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. आगामी काळात गावागावांत दौरे करून जनतेशी अधिक घट्ट संपर्क साधण्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते बबनराव भेगडे, काळूराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, महादू कालेकर, सुरेश धोत्रे, दीपक हुलावळे, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पंचायत समिती उपसभापती साहेबराव कारके, गटनेते दिलीप ढोरे, नारायण पाळेकर, नारायण ठाकर, किशोर सातकर, पंढरीनाथ ढोरे, खरेदी-विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे तसेच नगराध्यक्षा अबोली ढोरे उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, “मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून बारामतीच्या धर्तीवर तालुका विकसित होत आहे. मात्र, याच वेळी काही तरुण वर्ग नशेच्या आहारी जात असल्याचे चिंताजनक चित्र आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.” त्यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक जबाबदारी पार पाडत युवकांना योग्य दिशा देण्याचे आवाहन केले.
बैठकीत संघटनात्मक बळकटी, बूथस्तरावर कामकाज वाढवणे, जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने प्रतिसाद देणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यकर्त्यांनीही पक्षासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचा संकल्प केला.
एकूणच, मावळ तालुक्यातील ही आढावा बैठक पक्ष संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाची ठरली असून आगामी राजकीय घडामोडींसाठी दिशा देणारी ठरल्याचे चित्र आहे.






















