ही पत्रकार परिषद घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वडगाव शहर नगरपंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली “जनसंवाद यात्रा”
वडगांव मावळ : वडगाव शहराच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या व तब्बल 52 दिवस चाललेल्या यात्रेदरम्यान शहरातील एकूण 17 प्रभागांमध्ये भेटी देऊन 25000 पेक्षा जास्त लोकसंख्येचा सर्वे पूर्ण करुन 7500 हुन अधिक कुटुंबांच्या नोंदी करण्यात आल्या.
नक्की या यात्रेदरम्यान काय घडले ..? या मागील उद्दिष्ट काय होते ..? या यात्रेदरम्यान आम्हाला जनतेशी संवाद साधताना आलेले अनुभव तसेच जनतेचे प्रश्न व समस्या समजावून घेऊन त्या वडगावकर नागरिकांसमोर एकत्रितरित्या मांडाव्यात आणि या सर्व समस्यांवर कार्यवाही व पुढील उपाययोजना काय करता येईल ?
साधारणतः वर्ष ते दीड वर्षांपूर्वी वडगाव नगरपंचायत स्थापनेनंतर पाच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर शहरात प्रशासकीय शासन अस्तित्वात आले. मागील पाच वर्षात शहरात काय कामे झाली ? त्यांचा दर्जा कसा होता ? विकासकामे करत असताना तसेच विविध प्रश्नांवर उपाययोजना करत असताना त्या लोकांपर्यंत किती पोहोचल्या ?
प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांचा तसेच दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला ज्या समस्या भेडसावतात त्यांचे खरंच निरसन झाले आहे का ? याची माहिती घेण्यासाठी आणि जनतेचे थेट प्रश्न लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत या प्रमुख हेतूने ही जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली.
14 जानेवारी 2025 रोजी सुरू झालेल्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रत्येक घरी जाऊन तेथील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नियमित उद्भवणाऱ्या समस्या किंवा त्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा अभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या यात्रेदरम्यान वडगाव शहरातील वास्तविक परिस्थिती काय आहे ? तालुक्याच्या राजधानीचे शहर म्हणून नावलौकिक असणारे आपण वडगावकर नागरिक खरोखरच या खोट्या अंध:काराखाली चाचपडतोय हे बोलणे चुकीचे ठरणार नाही. शहरातील थोरामोठ्यांचे मार्गदर्शन त्यांच्या संकल्पना त्याचप्रमाणे माता-भगिनींना उपलब्ध नसलेल्या अत्यावश्यक सेवा यांचा अभाव, लहान मुलांचे शिक्षण, त्यांना खेळण्यासाठी मैदाने,बागबगीचे, जेष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र, सोईस्कर प्रवासी सेवा यांसारख्या अनेक गोष्टी ह्या वडगावात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट दिसून येते.
नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची मुद्देसूद मांडणी रुपेश म्हाळसकर यांनी आपल्यासमोर मांडली त्यातील काही वडगाव शहरातील पाणीपुरवठा व पाणीटंचाई. शहरातील फिल्टरप्लांट जीर्ण अवस्थेत आहेत अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे पाणी पळवून बिल्डरांना जास्तीत जास्त पाणीपुरवठा कसा करता येईल याचेच नियोजन होत असल्याचे निदर्शनास येते. असे अनेक विषय मांडले आहेत.




















