
मावळमध्ये महायुतीचा फॉर्म्युला मुंबईत ठरला — लोणावळा राष्ट्रवादीकडे, तळेगाव भाजपकडे
मावळ, दि. १२ : मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी अखेर महायुतीचा “मावळ फॉर्म्युला” निश्चित झाला आहे. मुंबई येथे काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, चंद्रकांत शेटे, गणेश भेगडे, इंदर ओसवाल, संदीप गराडे यांसह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.


या बैठकीत मावळ तालुक्यातील दोन प्रमुख नगरपरिषदांबाबत सविस्तर चर्चा झाली. ठरलेल्या फॉर्मुल्यानुसार लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे, तर तळेगाव दाभाडे नगरपरिषद भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले महायुतीतील मतभेद सध्या तरी शमले आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत एकूण १४ प्रभागांतून २८ नगरसेवकांची निवड होणार असून, नगराध्यक्ष पदासाठीही सत्ता वाटपाचा फॉर्मुला निश्चित झाला आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष पद भाजपकडे (संतोष दाभाडे पाटील) तर पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे (गणेश काकडे) राहणार आहे. या सत्तावाटपाच्या निर्णयाला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दुजोरा दिला असून, तळेगावातील निवडणूक तयारीस आता वेग मिळणार आहे.


या निर्णयानंतर लोणावळा व तळेगाव परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, महायुतीच्या या फॉर्मुल्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश दिला आहे.
तथापि, सर्वच स्तरावर या निर्णयाला एकमताने पाठिंबा मिळालेला नाही. लोणावळ्यातील काही भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, वडगाव नगरपंचायतीसाठी महायुतीचा निर्णय अद्याप प्रलंबित असून, तिथल्या राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता कायम आहे.


राजकीय सूत्रांच्या मते, या फॉर्मुल्यामुळे मावळ तालुक्यातील महायुतीचा पाया अधिक मजबूत होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कार्यकर्त्यांमधील नाराजी कमी करण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नशील राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुतीचा हा निर्णय मावळच्या राजकारणाला नव्या दिशेने नेणारा ठरू शकतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नवे राजकीय समीकरण घडण्याची चिन्हे दिसत आहेत.




















